मुंबई. दि. २५ जून २०२०
राज्यातील आशासेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्या अखेर महाविकास आघाडी सरकारने मंजुर केल्या आहेत. १ जुलैपासून आशासेविकांच्या मानधनात २ हजार तर आशा गटप्रर्तकांना दरमहा ३ हजार अशी वाढ देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागण्यांना मंजुरी देण्यात आली.
आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी १५७ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तशी तरतूदही करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून मानधन वाढ करावी अशी त्यांची मागणी होती अखेर त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
करोनाच्या संकटात सर्वात कठीण, जोखमीचे काम असतानाही आशा सेविकांनी जीवाची पर्वा न करता पार अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडले व अजूनही त्या ही सेवा करतच आहेत. त्यांच्यामुळेच घरोघरी जाऊन कोरोनाचे रुग्ण शोधण्याकामी मोठी मदत झाली आहे. आघाडी सरकारने या कोरोना योद्ध्यांची मागणी मान्य करुन त्यांचा एकप्रकारे सन्मानच केला आहे. आशा सेविकांना इतरवेळी गर्भवतीची प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूती, बाळाचे लसीकरण, बालकांना पूरक आणि पोषण आहारासह जवळपास ७८ कामे करावी लागतात.









