शेतकऱ्याच्या बांधावर तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी ‘कृषी संजीवनी सप्ताह’!
मुंबई दि.१ जुलै २०२०
महाराष्ट्राचा शेतकरी सक्षम आणि स्वयंपूर्ण झाला पाहिजे असे स्वप्न महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी पाहिले होते. आजच्या काळात आपला शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक असून कृषी संजीवनी सप्ताहाच्या माध्यमातून अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांना मिळण्यास मदत होईल असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
थोरात म्हणाले की, हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी काम केले. शेती, जलसंधारण क्षेत्रात त्यांनी आमुलाग्र बदल केले. नवीन बी-बियाणे, शेतीसाठी खतांची/पाण्याची उपलब्धता यासाठी काम करताना महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपूर्ण कसा होईल यासाठी प्रयत्न केले.
पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम कृषी संजीवनी सप्ताहाद्वारे राबवला जात आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन मंत्री संदिपन भुमरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात कृषी संजीवनी सप्ताह आयोजित करण्यात येत असून त्याचा फायदा राज्यातील सर्वदुर शेतकऱ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
