पुन्हा लाॅकडाऊन नको असेल तर शिस्त पाळा..!

0
IMG_20201122_220649

पुन्हा लाॅकडाऊन नको असेल तर शिस्त पाळा..!

सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला असं नाही!

मुंबई, दि २२ नोव्हेंबर :
महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही, पण सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्यातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संबोधित केले…
मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे की काय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही .

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आहे. आजपर्यंत आपण त्यांना सांभाळून होतो. आता कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये वाढतोय आणि त्यांच्या माध्यमातून घराघरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत होतोय हे निश्चितच खूप धोकादायक आहे.  आज आपल्या हातात लस नाही, कधी येईल ते सांगता येत नाही. आली तरी राज्यातल्या सर्व लोकांना अगदी दोन डोस द्यायचे म्हटले तरी २४ ते २५ कोटी जनतेला द्यावी लागेल.

त्यामुळे केवळ मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात धूत राहणे हीच त्रिसूत्री आहे. कोविडनंतर रुग्ण खडखडीत बरे सुद्धा होत आहेत पण पोस्ट कोविड दुष्परिणाम सुद्धा दिसताहेत. आपण कशासाठी विषाची परीक्षा बघायची असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि, आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन सावधपणे पावले टाकत आहोत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *