दिवाळीनंतरचे १५ दिवस अत्यंत कसोटीचे!
पाश्चिमात्य देशांत कोरोनाची लाट नाही तर त्सुनामी…
मुंबई, दि. 8 नोव्हेंबर:
राज्यातील कोरोनाची रुग्ण संख्या घटलेली दिसत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘पाश्चिमात्य देशात आपण जी काही आकडेवारी बघतो आहोत. तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावर करोनाची दुसरी लाट आलेली आहे. इटली, ब्रिटन, लंडन इत्यादी ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउन सुरू केलेला आहे. स्पेनमध्ये तर घरातल्या घरात कुटुंबीयांना देखील मास्क वापरण्यास सांगितले गेले आहे. याचं कारण म्हणजे थोडीशी बेफिकीरी.
आता संपलं सगळं, गेले एक-दोन महिने काहीच झालेलं नाही म्हणजे झालं सगळं, असं नाही. तिकडे थंडीचा काळ सुरू होत असल्याने हा विषाणू परत वाढीस लागल्याचे दिसत आहे. या लाटेच्या आकडेवारीकडे जर आपण पाहिलं. तर मी म्हणेन ही लाट नाही ही त्सुनामी आहे.’
सुरूवातीस जेव्हा तिथे लाट आली होती व सर्वोच्च पातळीवर पोहचून, करोना संसर्गाची घसरण झाली होती. पण आता पुन्हा दुप्पटी-तिप्पटीपेक्षा जास्त प्रमाणात करोना परतला आहे. आपल्याकडे असं होणार नाही, होऊ द्यायचं नाही. पण मागील आठ ते नऊ महिने आपली यंत्रणा अत्यंत तणावात ही लढाई लढत आहे. ते कुणासाठी आहे? याचा आपण विचार करायला हवा’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
