कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक क्षमता वाढवा
मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर:
कांदा प्रश्नी मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अडचणीतूम मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले असून बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा ही २५ मेट्रिक टनावरून १५०० मेट्रिक टन इतकी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
गोयल यांना पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात, ‘ २३ ऑक्टोबर २०२० रोजी जीवनावश्यक वस्तु कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी २५ मेट्रिक टन तर किरकोळ कांदा व्यापाऱ्यांसाठी फक्त २ मेट्रिक टनापर्यंत साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्राने २९ ऑक्टोबर २०२० च्या सुचनेप्रमाणे बाजार समितीतील कांदा खरेदीच्या दिनांकापासून पॅकेजिंग साठी 3 दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधीही खुप कमी असून तो सात दिवसांचा करण्यात यावा.
रब्बी कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून एकूण उत्पादनाच्या १/३ उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. देशाच्या एकूण कांदा निर्यातीमध्येही महाराष्ट्राचा हिस्सा ८० टक्के असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. रब्बी हंगामातील कांदा उत्पादनाचे क्षेत्र वाढले असून अंदाजे १०० लाख मे. टन कांद्याचे उत्पादन झाले आहे.
