एकाच दिवसात २६४४० रुग्ण झाले बरे!
नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट.
राज्याचा रिकव्हरी रेट ८३ टक्क्यांवर.
मुंबई, दि. १० ऑक्टोबर:
आज एका दिवसात नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नविन रुग्णांचे निदान झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५ टक्के) आले आहेत. राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २४ हजार ९९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.
