हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या!
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा भाजपा रस्त्यावर.
औरंगाबाद, दि. २ ऑक्टोबर:
राज्यामधील विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाशी सामना करावा लागतोय. राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागांच्या शेतकऱ्यांचे विलंब न करता सरसकट पंचनामे करावे.बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये तर कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपयांची त्वरित मदत करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या मराठवाडा दौ-याला आजपासून प्रारंभ झाला. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेत-पीकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतक-यांची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. आज दरेकर यांनी फुलंब्री येथे चौक गाव, मानमोडी शिवार तसेच कन्ऩड तालुक्यातील नाचनवेल गावामध्ये जाऊन अतिवृष्टी झालेल्या व पुराने बाधित झालेल्या शेतक-यांच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतक-यांच्या जमिनीच्या नुकसानीचा अंदाज घेतला. बांधावर जाऊन शेतक-यांशी संवाद साधला. शेतक-याला दरेकर यांनी धीर दिला व सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आग्रह धरण्याचे वचनही दरेकर यांनी दिले.
मराठवाड्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, बाजरी या पिकांच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या विभागांमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी करून दरेकर यांनी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित देण्यात यावेत अशी मागणी करताना प्रविण दरेकर यांनी याबाबत सरकारने आठवड्याभरात निर्णय नाही घेतला तर भाजप रस्त्यावर उतरेल असा इशाराही सरकारला दिला आहे. अनेक ठिकाणी पीक विमाचे पैसे भरून सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही ही बाब गंभीर असून या याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी दरेकर यांनी केली.
कन्नड भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घराला भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी दरेकर यांनी केली. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी शेतक-यांच्या घरांची पडझड झाली आहे.त्यांचेही त्वरित पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
