भाजपाला मतचोरीतही हिंदू मुस्लीम दिसते..
भाजपाला मतचोरीतही हिंदू मुस्लीम दिसते..
मुंबई, दि. ४ नोव्हेंबर २०२५.
राज्यात व केंद्रातील भाजपाचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केलं आहे. हा प्रकार लोकशाही साठी अत्यंत घातक आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला यातही हिंदू- मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे प्रत्युतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतचोरी मुद्दा सर्वात आधी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी उघड केला. आता देशभरातील विरोधी पक्ष याप्रश्नी आवाज उठवत आहेत. निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिंन्ह उभे राहिले आहे. काँग्रेस पक्षाने हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे काँग्रेस पक्षाने प्रचंड मोठे आंदोलनही केले.
मुंबईत दोन दिवसापूर्वी निघालेल्या मोर्चातही काँग्रेस पक्षाने सहभाग घेतला होता. या मोर्चावेळी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते व झेंडेही होते पण भाजपा त्यावरही टीका करत आहे, ते चुकीचे आहे. या मोर्चात मी सहभागी होण्याचा मुद्दा गौण असून मतचोरी हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
