आणीबाणीला RSS प्रमुख बाळासाहेब देवरसांचे समर्थन.
आणीबाणीला RSS प्रमुख बाळासाहेब देवरसांचे समर्थन.
मुंबई, दि. २६ जून २०२५;
देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिराजी, सोनियाजी व राहुलजी गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी आरएसएसचा संबंध नाही असेही जाहिर केले होते. भाजपाला बाळासाहेब देवरसांची भूमिका मान्य नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लागू करण्याचा जो निर्णय घेतला होता तो संविधानिक होता. देशात काही शक्ती अराजक निर्माण करू पहात होत्या. नंतर आणीबाणी उठवून निवडणुका घेतल्या आणि लोकशाही प्रक्रिया पार पाडली. इंदिराजी गांधी यांनी आणीबाणीवेळी देशाची संपत्ती विकली नाही, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपतींच्या घशात घातल्या नाहीत. पण देशात मागील ११ वर्षांपासून अघोषीत आणीबाणी सुरु आहे, विमानतळ, बंदरे, खाणी, बँका, सरकारी जमिनी लाडक्या उद्योगपतीला विकल्या जात आहेत. धारावीची जमीन विकली आहे. देशात आज हुकूमशाही असून भाजपाचा भस्मासूर लोकशाही गिळू पहात आहे.
सरकारी जाहिरातीत सेंगोल कसा?
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आज आणीबाणी संदर्भात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत जाहिरातबाजी केली आहे. सरकारी जाहिरातीतून राजमुद्रा गायब असून सेंगोल दाखवला आहे. सेंगोल कशाचे प्रतिक आहे, हे वेगळे सांगायला नको. भाजपाला लोकशाही व संविधान संपवून गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट’ लागू करायचे आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
