‘अलमट्टी’च्या उंचीवाढी विरोधात कोल्हापूरात आंदोलन.
‘अलमट्टी’च्या उंचीवाढी विरोधात कोल्हापूरात आंदोलन.
कोल्हापुर, दि. १९ मे २५ –
सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात प्रश्न मांडले तरी त्याची दखल घेतली गेली नाही. येत्या काळात हा लढा असाच चालू ठेवला नाही तर अलमट्टी धरणाचे भूत कायम आपल्या मानगुटीवर असणार आहे. कृष्णा लवादाला आम्ही काही हरकती पाठवल्या आहेत. आता आपण सर्वांनीही दिल्लीपर्यंत त्या पाठवून रस्त्यावरच्या लढाईसोबतच कागदपत्रांची कायदेशीर लढाई लढा असे काँग्रेस नेते माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले.
सतेज पाटील म्हणाले, कर्नाटक राज्याने केंद्राकडे अलमट्टी धरणाच्या उंची वाढीसाठी 1 लाख कोटींच्या निधीची मागणी केली असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांनी या विरोधात लेखी भूमिका मांडावी. तसेच या मुद्द्याविरोधात ज्या पद्धतीने तेलंगणा राज्याने सुप्रिम कोर्टात जाण्याची भुमिका घेतली आहे. तशीच महाराष्ट्र सरकारनेही विरोधाची भूमिका ठोस कारणासह केंद्रसरकार समोर मांडावी, गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा मार्ग अवलंबावा अशी मागणी पाटील यांनी केली.
नव्याने एक समिती स्थापन करून त्यात पुरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या भागातील शेतकरी आणि अभ्यासू लोकांचा समावेश केला पाहिजे. या मुद्द्यावर 21 तारखेला राज्यशासनाकडून बैठक बोलवण्यात आली असून यासाठी पुरग्रस्त भागातील लोकप्रतिनिधींना मात्र बोलवण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकार जोपर्यंत या बैठकीसाठी बोलवत नाही तोपर्यंत आम्ही चक्काजाम आंदोलन चालूच ठेवणार आहोत. शासनाचे अधिकृत लेखी पत्र येत नाही तोपर्यंत ही रस्त्यावरची लढाई अशीच चालू राहील असा इशाराही पाटील यांनी दिला.
