नो रिझन ऑन दि स्पॉट डिसीजन!
नो रिझन ऑन दि स्पॉट डिसीजन!
यवतमाळ, दि. ४ एप्रिल २०२५:
यवतमाळमधील शेतकऱ्यांसाठी माहायुती सरकारने १००० कोटी आणि पोहरादेवी देवस्थान विकासासाठी ७५० कोटींचा निधी दिली. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे म्हणूनच लोकांनी महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळवासीयांचे आभार मानले.
यवतमाळ येथे आयोजित आभार यात्रेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय राठोड यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, यवतमाळवासीयांच्या आशीर्वादाने संजय राठोड यांनी २०२४ ला विजयाचा चौकार लगावला. आता ते मंत्री आणि पालकमंत्री आहेत. लोकांमध्ये जा, लोकांशी बोला, संवाद साधा निर्णय घ्या, असे निर्देश शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना दिले आहेत. शासन आपल्या दारी या उपक्रमातून पाच कोटी नागरिकांना फायदा झाला. एकाच छताखाली अनेक योजनांचे लाभ लोकांना त्यांच्या दारात जाऊन दिले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका घेऊन उबाठाने बाळसाहेबांच्या हिंदुत्वाला कलंक लावण्याचे काम केले. २०१९ ला स्वत:च्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली होती, आता वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध करुन दुप्पट गद्दारी केली, अशी खरमरीत टीका शिंदे यांनी उबाठावर केली.
ते पुढे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. नो रिझन ऑन दि स्पॉट डिसीजन अशा प्रकारे काम करणारे सरकार आहे. ज्यांनी प्रत्येक कामात रिझन दिले त्यांचा सिझन निवडणुकीत जनतेने संपवला, अहंकारात बुडालेले आता तरी सुधारा, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. कोण गद्दार कोण खुद्दारा याचा हिशेब जनतेने केला. ते पुढे म्हणाले, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथ जो काम करेल तो पुढे जाईल, काहीजण कार्यकर्त्यांना कसपटासमान समजायचे. मात्र या महाराष्ट्रात सर्वसामान्यांचा सरकार आणण्याचे काम केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
