महापरिनिर्वाण दिनी रात्रभर लोकलसेवा सुरु ठेवा:
महापरिनिर्वाण दिनी रात्रभर लोकलसेवा सुरु ठेवा:
मुंबई, दि. १ डिसेंबर :
संविधान निर्माते महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी मुंबईत दाखल होत असतात. मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखोंचा जनसागर भेट देत असतो. दादरला भेट देण्यासाठी मुंबईतील लोकल सेवा ५ व ६ डिसेंबर २०२४ रोजी रात्रभर सुरू ठेवावी अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षाताई गायकवाड पुढे म्हणतात की, दरवर्षी गणेशोत्सवात गणेश भक्तांसाठी मुंबईतील लोकलच्या विशेष फे-या रात्रभर सुरू असतात. महापरिनिर्वाण दिनीही महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक मुंबईत येतात. पालघर, ठाणे, नवी मुंबई येथून भिमसैनिक दादरला येतात त्यांच्या सोयीसाठी लोकलची विशेष सेवा सुरू ठेवावी असे या पत्रात म्हटले आहे.
