‘त्यांना’ १५०० रुपयांची किंमत काय कळणार?
नाशिक, ता. १६ ऑगस्ट :
करोडो रुपयांमध्ये लोळलेल्या आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना १५०० रुपयांचे मोल काय कळणार, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. नाशिकमधील श्री क्षेत्र सरला बेट येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात ते बोलत होते. राज्यातील बहिणींना आधार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यात आडवे आलात तर या बहिणीच योग्य उत्तर देतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
<span;>ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात गेले मात्र कोर्टाने त्यांना चपराक लगावली. बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर विरोध करणाऱ्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले आहेत, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली. दसरा-दिवाळी आणि गणपतीला दिला जाणारा आनंदाचा शिधा रोखण्यासाठी विरोधक कोर्टात गेले होते. गरिबाच्या तोंडातला घास हिरावण्याचे काम विरोधकांनी केले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांकडून आरोप सुरु आहेत मात्र या आरोपांना आपण कामातून उत्तर देतो. संतांचा आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद पाठिशी असल्याने काम करण्याची ऊर्जा मिळते, असे ते म्हणाले.
<span;>मुख्यमंत्री म्हणाले की १४ ऑगस्टपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहे. आतापर्यंत ८० लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळाले. रक्षाबंधनपर्यंत दीड कोटी बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सप्टेंबरमध्ये अर्ज भरला तरी त्या बहिणीला तीन महिन्यांचे पैसे दिले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न करणाऱ्या सावत्र भावांपासून सावध राहण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
लाडक्या बहिणींबरोबरच लाडक्या भावांना देखील सरकारने पैसे दिले. पैसे देण्याची दानत लागते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केली, ज्येष्ठांना वयोश्री योजनेतून दरमहा ३००० रुपये दिले तसेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक योजना या सरकारने सुरु केल्याचे ते म्हणाले.
