नालेसफाईचा BMC चा दावा धादांत खोटा..

0
20240304_194307

मुंबई, दि. २४ मे ;

मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी सत्ताधारी पक्ष आणि सरकार नियुक्त मुंबई महानगरपालिका प्रशासकानी करदात्यांचे २५० कोटींहून अधिक रुपये खर्चूनही कामाचे वास्तव भयावहच आहे. अनेक भागात अजून ५० टक्केही काम झालेले नाही. महापालिका प्रशासकाने नालेसफाईच्या कामाची अधिकृत आकडेवारी जनतेसमोर विस्तृतपणे मांडावी व नालेसफाई घोटाळ्याची चौकशी त्वरित करून सर्व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

 

 

नालेसफाईवर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ७५ टक्के नालेसफाईचे काम झाल्याचा मुंबई महापालिकेचा दावा धादांत खोटा आहे. अनेक भागांत नालेसफाईची कामे झालीच नाहीत हे वास्तव आहे. अनेक ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा अजून तिथेच पडून आहे. प्रत्यक्षात ५० टक्के पेक्षाही कमी काम झाले आहे, ते ही समाधानकारक नाही. सत्ताधारी पक्ष आणि पालिका प्रशासनाच्या भ्रष्ट व ढिसाळ कारभारामुळे यंदाही मुसळधार पाऊस झाल्यास मुंबई तुंबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही नालेसफाई नव्हे तर सत्ताधारी, महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये ‘सेटिंग’ झालेली निव्वळ ‘हाथ की सफाई’ आहे.

नालेसफाईबद्दल लोकांमध्ये असलेला तीव्र आक्रोश लक्षात घेता भाजपा या पापामधून स्वतःचे हात झटकण्याचे प्रयत्न करत आहे पण या महाघोटाळ्यात ते देखील तितकेच वाटेकरी आहेत हे जनता जाणून आहे. तेव्हा भाजपाला यातून पळ काढता येणार नाही, मुंबईकरांना हिशोब तर द्यावाच लागेल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *