तुमचे २० दिवस मला द्या पुढील ५ वर्षे तुमची सेवा करते.
मुंबई, दि. ३० एप्रिल;
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकनेते एकनाथ गायकवाड यांनी विजय संपादन करून संसद गाठली होती, यावेळी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी दिली असून सर्वात जास्त बहुमताने निवडणून द्या, असे आवाहन करत दिवस खूप कमी आहेत, प्रत्येकाने स्वतःच वर्षा गायकवाड आहे असे समजून काम करा, हे २० दिवस मला द्या पुढील ५ वर्षे तुमची सेवा करेन, असे आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले.
विलेपार्ले व वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, मला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर गेले असता त्यांनी मला आशिर्वाद देताना छोटी बहिण असल्याचे सांगितले. आपल्याकडे बहिणीची इज्जत ही आपल्या इज्जतीपेक्षा जास्त मोलाची असते. मला तुमचा विश्वास व आशिर्वाद मिळत आहे याबद्दल आभारी आहे. मी एक सामान्य कार्यकर्त्यासारखी काम करते. अनेक वर्षांपासून राजकारणात असून असंख्य लोकांचा विश्वास संपादन केला आहे. राजकारणात निष्ठा व विश्वासार्हता खूप महत्वाची असेत, ती मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आज राजकारणाची परिभाषा बदलली असली तरी संस्कारमय व संसदमय राजकारण महाविकास आघाडीच्या माध्यमातून केले जात आहे, असेही वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.
या बैठकीला शिवसेना नेते व माजी मंत्री अनिल परब यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
