NCP चे दोन माजी नगरसेवक शिवसेनेत !
NCP चे दोन माजी नगरसेवक शिवसेनेत !
ठाणे, दि. २४ डिसेंबर :-
मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून खान आणि त्यांचा पत्नी माजी नगरसेविका ज्योती हारुन खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. शिवसेनेच्या किसन नगर 2 येथील शाखेत हा पक्षप्रवेश संपन्न झाला यावेळी खान यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, हारून खान यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या आधीही पाच मुस्लीम नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून ही संख्या 50 नगरसेवकांच्या वर गेली आहे. मुंबईतील आपापल्या भागातील विकासाचे प्रश्न सुटावेत यासाठी हे सारे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असून ही संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो, किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हजार टँकर्सच्या माध्यमातून एक दिवसाआड मुंबईतील रस्ते स्वच्छ करून धुतले जात आहेत. आपण स्वतः या अभियानात सहभागी होऊन पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेत असून त्यामुळे शहर अधिक सुंदर होत आहे. यापूर्वी कधीही मुंबईतील रस्ते धुतलेले कुणी पाहिले होते का..? मात्र आज ते स्वच्छ करून मग धुतले जात आहेत. पावसाळ्यातही आपण जातीने भेट देऊन नालेसफाईची पाहणी केली त्यामुळे यंदा रस्त्यावर पाणी सचल्याचा फारशा तक्रारी आल्या नाहीत, रस्त्यावर फारसे खड्डे देखील दिसले नाहीत हे सारे करायचे तर प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते प्रत्यक्ष काम करावे लागते घरात बसून हे साध्य होत नाही असेही यावेळी बोलताना शिंदे यांनी सांगितले.
विक्रोळी पार्क साईट परिसरातील रुग्णालयाची प्रलंबित मागणी असो किंवा या भागातील रखडलेले एसआरएचे प्रकल्प असो ते शासनाच्या वतीने गती देऊन पूर्ण केले जातील. मुंबईतील आशा रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एमएसआरडिसी, म्हाडा, सिडको, एमआयडिसी अशा सर्व यंत्रणांना एकत्रित करून या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे यावेळी बोलताना शिंदे यांनी सांगितले. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
