उद्घव ठाकरेंचा धारावी मोर्चा पाप लपवण्यासाठी…
उद्घव ठाकरेंचा धारावी मोर्चा पाप लपवण्यासाठी…
नागपूर, दि. १६ डिसेंबर :
उद्घव ठाकरे यांचा मोर्चा फुसका बार होता. तुमच्या हातात अधिकार असताना फेसबुक लाईव्हवर राहिले आणि आता 3 राज्याच्या निकालानंतर घाबरलेले ठाकरे मोर्चाचे प्रयोग करताहेत. उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरावे लागले, त्यांनी केलेलं पाप आहे. अडीच वर्षे मंत्रालयात आले नाहीत, महाराष्ट्र मागे आला, मुंबईचा विकास थांबला, हे पाप लपवण्याकरिता धारावी विकासाचा ब्लंडर बनवायचे व जनतेला मूर्ख बनवण्याकरिता मोर्चे काढत आहेत, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले की, ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली असून निष्क्रियता समोर आली त्यामुळे ते थापा मारण्याचे काम करीत आहेत. उद्धव ठाकरेंवर मुंबईची जनता विश्वास ठेवत नाही. धारावी प्रकल्पात धारावीकर नागरिकांना मोठा फायदा होणार, प्रकल्प पारदर्शी पद्धतीने पूर्ण होईल, उद्धव ठाकरे त्यांच्या काळात गरिबांना घरे देऊ शकले नाही म्हणून आज मोर्चा काढत आहेत.
महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हिम्मत कोणाच्या बापाची, पक्षाची नाही, जनता त्यांच्या बोलण्यावर आता विश्वास ठेवत नाही, लोक कंटाळले आहेत. धारावी प्रकल्पाचे काम ठाकरे यांना त्यांच्या काळात करता आले असते परंतु निष्क्रियतेमुळे मागे पडले. हे काम आमच्या काळात होत आहे, मोर्चा काढून खोट्या गोष्टी करून सरकारवर आरोप करताहेत, उद्धव ठाकरेंचा ढोंगीपणा समोर आणण्यासाठी आम्ही समोर आलो आहोत असेही बावनकुळे म्हणाले.
