मागाठाण्यात ‘दिवाळी पहाट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद.
मागाठाण्यात ‘दिवाळी पहाट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद.
मुंबई, दि. १४ नोव्हेंबर;
भाजपा मागाठाणे विधानसभा आणि वीर सावरकर नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट मेघ मल्हार’ कार्यक्रमाला सुरांची मेजवानी ऐकण्यासाठी रसिक श्रोत्यांनी एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमाला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, अभिनेते स्वप्नील जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गायिका स्वराली पांचाळ, दीप्ती रेगे, गायक जयंत पिंगुळकर, सायबा ओव्हळ यांच्यासह सर्व वादकांच्या साथीने दिवाळी पहाट हा कार्यक्रम ऐकण्यासाठी परिसरातील रसिक श्रोत्यांनी सहभागी होत आनंद द्विगुणित केला. गायकांनी प्रभात समयी सुर-तालात अक्षरशः रसिकांना न्हाऊ घालत खिळवून ठेवले. ‘विठू माऊली तू, माऊली जगाची’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘मला ते दत्तगुरु दिसले’, या गाण्यांनी रसिकांची मने हेलावून गेली. यावेळी अभिनेते स्वप्नील जोशी, अभिनेत्री स्वाती देवल, क्षमा निनावे, संगीतकार प्रसाद बर्वे या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी बोलताना अभिनेते स्वप्नील जोशी म्हणाले की, कुठल्याही गोष्टीत कौशल्य आणता येते. मला कुणी विचारले कौशल्य आणि सातत्य यात मोठे काय तर मी सातत्याला उजवे माप देईन. कारण कौशल्य अनेकांकडे असते. पण सातत्य राहणे अत्यंत कठीण असते. सातत्य जर असेल तर कौशल्य आत्मसात करता येते पण कौशल्य असेल तर सातत्य आत्मसात करता येत नाही. सातत्य राखावे लागते. तो कार्याचा, यज्ञाचा भाग आहे. गेली १३ वर्ष हा जो येथे यज्ञ सुरू आहे, नानाविविध उपक्रम राबविले जातात, लोकांशी संवाद साधला जातो हा संवाद सुरू राहिला पाहिजे. हे सगळी संवाद साधण्याची माध्यमे आहेत. संवाद दुतर्फी असतो, संवाद कधीच एकतर्फी असू शकत नाही. ज्या पद्धतीने या संवादाला दरवर्षी प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो.
