20220424_135511

पक्ष व चिन्हाचा निर्णय काहीही येऊ द्या !

दिल्ली, दि. ५ ऑक्टोंबर;

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. आज ७० लोकांनी माझ्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. पक्ष आणि चिन्ह हे आपलंच असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्य समितीची दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बैठक पार पडली त्यावेळी शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, पक्षाचं चिन्ह त्यांना मिळेल असा त्यांचा दावा आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय काही आला तरी चिंता करण्याचं कारण नाही. पक्ष आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल. देशाचं राजकारण बदलत आहे. आज अनेक राज्यात भाजपाचं सरकार नाही. काही राज्यातील विरोधी पक्षाची सरकारं पाडून अनेक ठिकाणी भाजपने सत्ता स्थापन केली आहे.

 

जुन्या सहकाऱ्यांनी आपल्याविरोधारात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. त्याचं उत्तर दिल्लीतील कार्यकारणीच्या बैठकीत झालेल्या ठरावाने दिलं आहे. ते लोक म्हणतात की तेच राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. तालकटोरा येथे झालेल्या बैठकीतील राष्ट्रीय अध्यक्षाची निवडच चुकीची आहे. ते म्हणतात की निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना काहीच अधिकार नाहीत. यापुढे जाऊन ते म्हणतात की तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत आणि पक्षाचं नाव, पक्षचिन्ह याचा वापर करण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे. आपल्याला नाही.

८ लोकांना मंत्रिमंडळात सहभागी केलं. हे लोक मला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी म्हटलं की, आमच्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आम्हाला बीजेपी सोबत जावं लागलं. तुम्ही याबाबत काहीतरी उपाययोजना करा. काही इमानदार कार्यकर्ते होते त्यापैकी एक अनिल देशमुख, त्यांनी पक्ष सोडला नाही असंही शरद पवार म्हणाले.

बंडखोरी करून बाहेर पडलेल्याची निवड ही चुकीची आहे. निवडणुकीची पद्धत कशी असावी हे मी त्यांना सांगितलं. जे आज म्हणतात की ही निवडणूक योग्य नव्हती. मात्र यावर त्यांच्या सह्या आहेत. आम्ही एकत्र बसलो चर्चा केली. जे लोक गेलेत ते म्हणतात की पक्ष आम्हाला मिळेल चिन्ह मिळेल. जे अजून व्हायचे आहे ते कसं सांगतात की हा निर्णय आमच्या बाजूने लागेल? मला कळत नाही हे असं कसं असू शकतं? असे प्रश्नही शरद पवारांनी उपस्थित केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे उद्घाटन करायला जातात आणि त्यांची विरोधकांवर कुरघोडी करण्यास सुरूवात होते. भोपाळला गेल्यावर भाषण दिलं की राष्ट्रवादी पार्टी भ्रष्ट आहे. जर पार्टी भ्रष्ट आहे तर चौकशी करा आणि जर खरं असेल तर कारवाई करा. मात्र, ज्यांच्याविरोधात आरोप केला ते आज राज्य मंत्रिमंडळातच आहेत, असेही शरद पवार म्हणाले.

भाजपने निवडणूक चिन्ह बदललं पाहिजे. लोक म्हणतात त्यांनी चिन्ह बदलून वाशिंग मशीन करावं असं लोक महाराष्टात म्हणतात. ईडी, सीबीआय आयटी यांचा गैरवापर केला जातोय. एका मीडिया हाऊसवर छापेमारी केली. त्यांच्या विरोधात तक्रार केली की चीनला मदत केली. कालची कारवाई ठीक नाही. ती कारवाई चुकीची आहे. त्यांनी भाजपची स्थिती मांडली होती. देशात बदल होईल असेही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *