शरद पवारांच्या राजीनाम्याने विरोधकांच्या एकजुटीला खीळ…
शरद पवारांच्या राजीनाम्याने विरोधकांच्या एकजुटीला खीळ…
मुंबई दि. २ मे :-
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीचे चाललेले प्रयत्न खिळखिळे होणार आहेत. राष्ट्रीयस्तरावर विरोधी पक्षाच्या एकजुटीला खीळ बसणार आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद; केंद्रात कॅबीनेट मंत्रीपद भुषविलेले आहे. त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव राहिलेला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात त्यांनी राजकीय पटलावर आपल्या नेतृत्वाचा अमीट ठसा उमटविलेला आहे. संपूर्ण देशात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन चांगले वाढविले आहे. महाराष्ट्रात प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व उभे आहे. त्यांच्या सारखे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुसरे मिळु शकत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवारांनी सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी होईल. शरद पवारांएवढे उत्तुंग नेतृत्व इतर कोणताही नेता राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ताकदीने शरद पवारांनी चालविली त्या ताकदीने इतर कोणताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवु शकत नाही. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कमजोर होत जाईल असे रामदास आठवले यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
