कोकणात मुसळधार, मुंबई-गोवा वाहतूक बंद!
कोकणात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.
काळ पुलावर पाणी, चिपळूण, महाडच्या बाजारपेठेत पाणी.
मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक बंद.
रायगड, दि. 5 ऑगस्ट
कोकणातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, चिपळूण, महाड सह इतर शहरात पाणी शिरले आहे. पुलांवर पाणी आल्याने मुंबई गोवा हायवे बंद करण्यात आला आहे.
उपविभागीय अभियंता, राज्य महामार्ग विभाग, पेण यांनी माणगाव तालुक्यातील घोडनदीवरील कळमजे येथील पूलावरुन पाणी वाहत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला असून काळ पूलावर जड वाहने थांबविण्यास मनाई करण्याबाबतही स्थानिक प्रशासनास कळविले आहे.
त्यामुळे पुराचे पाणी कमी होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक थांबविण्यात येत असून लहान वाहनांची वाहतूक कोलाड-विळे -निजामपूर-बोरवाडी-डालघर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या मार्गावरुन फक्त दिवसा लहान वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. पर्यायी मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीस परवानगी नाही.
राज्य महामार्ग विभाग व पोलीस विभागाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तहसिलदार, माणगाव यांनी कळविली आहे.
सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 40 तासांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जवळपास सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक थांबविण्यात आली आहे.
खेड मधील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. येथे इशारा पातळी 6 मीटर असून धोक्याची पातळी 7 मीटर आहे. सध्या प्रवाह 6.75 मीटरवर आहे.
