महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार !
महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार !
नवी दिल्ली, दि. १६ डिसेंबर:
महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार आहे. सर्जा राजाची जोडी सुस्साट सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई हायकोर्टाने यापूर्वी बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर बैलगाडी मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या संदर्भात २०१७ मध्ये एक कायदा संमत केला होता. मात्र त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ या राज्यात आजही बैलगाडी शर्यती सुरू आहेत. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यत सुरू व्हाव्यात अशी मागणी होत होती. आज अखेर बळीराजाला आनंदाची बातमी मिळाली.
ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. बैलगाडी शर्यत व्हावी यासाठी राज्यातील मंत्री दिलीप वळसे पाटील, सुनील केदार, सतेज बंटी पाटील यांच्यासह अनेकांनी यासाठी प्रयत्न केले.
