NEET परीक्षेसाठी हवाई दलाची मदत घेणार!
नवी दिल्ली, दि. २९ मे २०२६.
नीट परिक्षेचा पेपर फुटल्याने देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. २३ लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा चुराडा या पेपरफुटीने केला आहे. एक परीक्षाही सरकार व्यवस्थित घेऊ शकत नाही यावरून मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे. २१ जून रोजी पुनर्परीक्षा होत असून त्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे..
NEET परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक तयारी केली आहे. २१ जून रोजी नियोजित असलेल्या पुनर्परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांची वाहतूक करण्याकरिता भारतीय हवाई दलाच्या विमानांचा वापर करण्याबाबत गांभीर्याने विचार केला जात आहे.
NEET-UG पेपरफुटीवरून निर्माण झालेल्या गदारोळानंतर, पंतप्रधान मोदी स्वतः या पुनर्परीक्षेच्या प्रक्रियेवर जातीने लक्ष ठेवणार आहेत. NEET च्या पुनर्परीक्षेबाबत केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली ‘NEET’ च्या पुनर्परीक्षेबाबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली, या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, पंतप्रधान कार्यालयातील (PMO) वरिष्ठ अधिकारी, NTA चे महासंचालक अभिषेक सिंह आणि विविध मंत्रालयांमधील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनुसार, सरकार भारतीय हवाई दलाचा (IAF) वापर केवळ रसद पुरवठ्याच्या उद्देशाने करण्यावर विचार करत आहे. वेळेचा अभाव आणि सरकारला कोणताही धोका पत्करायचा नाही. यामुळे हवाई दलाची मदत घेण्याचा विचार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Leave a Comment