मुंबई, दि. 2 ऑक्टोबर:
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज देशभरात साजरी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहिली आहे.
राज ठाकरे म्हणतात,“आज महात्मा गांधींची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं ह्यातच गांधींजीना अडकवलं गेलं आहे. पण ते कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते आणि एखादी चूक, अपराध मग तो परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना, ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय.
त्यांच्यात अहंभाव नव्हता, ‘माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य असं समजा, कारण ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे,’ हे सांगण्याचा प्रांजळपणा होता.
सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं हे सुरु झालं आहे.

‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला’ हे त्यांचं तत्व अंगीकारलं जात असेल तर ठीक, पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट. कोरोनाच्या ह्या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरु आहे त्यात गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारल तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील.
महात्मा गांधींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन.
#MahatmaGandhi #GandhiJayanti
Leave a Comment