दम असेल तर निवडणूक फिक्सिंगवर खुलासा करा!
नागपूर, दि. ७ जून –
महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती, या निवडणुकीत नेमकी काय झालं याचं सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले आहे. दम असेल तर यावर खुलासा करावा असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, २०२४ लोकसभा निवडणुकी नंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांची वाढलेली संख्या आणि महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपल्यावर अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी याबाबत विविध लेखातून भूमिका मांडली आहे. मुळात केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्याची प्रक्रियाच सदोष आहे. त्यानंतर विविध यंत्रणांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकली असा आरोप विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केला. मतदानाची वेळ संपल्यावर २०२४ विधानसभा निवडणुकीत साडे आठ टक्के सरासरीने मतदानाची टक्केवारी वाढते हे संशयास्पद आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बेईमान पद्धतीने सरकार आलेले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वस्तुनिष्ठ माहिती दिली आहे, यावर संबंधितांनी खुलासा केला पाहिजे असे ही वडेट्टीवार म्हणाले.
Leave a Comment