Ads

--

सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? 

By Xtralarge News

March 21, 2025 11:43 pm

Ads

सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार?

मुंबई, दि. २१ मार्च २५ :

परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्कित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथ सुर्यंवंशी यांचा मृत्यू मारहणीमुळेच झाल्याचे उघड झाले आहे. आता तरी फडणवीस सरकार जागे होऊन संबंधित पोलिसांवर हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करणार आहे? का असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

 

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, परभणीची घटना अत्यंत गंभीर व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचे प्रकरण पोलीसांना व्यवस्थित हाताळता आले नाही. शहरात शांततेने आंदोलन सुरु असताना पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला, त्यात अनेकांना जबर मारहाण झाली, अनेकांना जेलमध्ये टाकले. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांनाही अटक करुन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला पण सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशानात सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याची चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली.

 

परभणीमध्ये कोंबिंग ऑपरेशन व लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला. मंत्रालयातून दिला, का पोलीस महासंचालक कार्यालयातून दिला याची चौकशी झाली पाहिजे. गृहमंत्री व मुख्यमंत्री नात्याने फडणवीस हे परभणीचे प्रकरण हाताळण्यात सपशेल फेल झाले आहेत. एका दलित तरुणाचा पोलिस मारहाणीत मृत्यू होतो पण सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही यातून भाजपा युतीचे सरकार दलित विरोधी आहे हे स्पष्ट दिसते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परभणीला येऊन सुर्यवंशी यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस पक्ष सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करेल, असेही सपकाळ म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment