Ads

--

जनतेला फसवणाऱ्या मोदी सरकारला घरी बसवा.

By Xtralarge News

April 18, 2024 6:52 pm

Ads

पुणे, दि. १८ एप्रिल:

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने शेतकरी, महिला, रोजगार या बाबत दिलेली आश्वासने आणि वस्तुस्थिती यात फरक आहे. दरवर्षी दोन कोटी मुलांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते पण गेल्या दहा वर्षांत नोकऱ्या कमी आहेत. सध्या देशातील तरुणाईचा जो आकडा आहे, त्यातील ८६ टक्के मुलं ही बेरोजगार आहेत. केंद्रातील सरकारने गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचे काम केले, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या जाहीर सभेतून शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

शरद पवार म्हणाले की, मोदींवर टीका केली म्हणून झारखंडचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री, बंगालचे तीन मंत्री तुरुंगात गेले. देशातील लोकशाही उद्ध्वस्त होत आहे. १० वर्षे सत्ता असणाऱ्या सत्ताधारी लोकांनी फसवले. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आले त्यावेळेस पेट्रोल ७१ रुपये लिटर होते आज १०५ रुपये आहे. सत्तेचा उन्माद काय असतो ही बाब सत्ताधारी लोकांनी दाखवून दिले आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केले. शब्द द्यायचा, आश्वासने द्यायची आणि ती पाळायची नाहीत, अशी जर मोदी नीती असेल तर आता मोदींना सत्ता द्यायची नाही याचा निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारला १८ टक्के जीएसटी द्यावा लागतो, हे सरकार लूट करत आहे. देशभरातून इंडिया आघाडीला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. या देशामध्ये लोकांनी आपले मत नक्की केले आहे. इंडिया आघाडीला ते प्रतिसाद देतील. भंडारा जिल्ह्यातील राहुल गांधींची सभा पाहून महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यांना अजूनही उमेदवार ठरवता येत नाही. काही ठिकाणी उमेदवार बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत.

ज्या लोकांना संसदरत्न काय आहे हे माहीत नाही. ते संसदरत्न कसा कमी आहे, हे सांगत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, आणि म्हणून त्यांना उमेदवार निश्चित करता येत नाहीयेत. आहेत ते उमेदवार बदलण्याचं धोरण मनात ठेवून काही ठिकाणी काम चालू आहे. रवींद्र धंगेकर पुण्यात आणि देशात दंगा केल्याशिवाय राहणार नाही. पुणेकरांना महागाई, बेकारी, कायदा व सुव्यवस्था, कोयता गँग यांच्या विरोधात मत द्यायचं असेल, तर ते धंगेकरांनाच मत देतील असेही जयंत पाटील म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment