केंद्रीय यंत्रणा सोमय्यांना कल्पना देऊनच कारवाया करतात ??
मुंबई दि. ५ एप्रिल :
शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त करण्याअगोदर त्यांना कल्पना देणे आवश्यक होते मात्र संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर जयंत पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केंद्रीय यंत्रणांच्या वापरावर आपले मत नोंदवले आहे. सर्वोच्च न्यायधीशांनीच असं मत व्यक्त केले असेल तर हे जगजाहीर आहे की, या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर व्हायला लागलेला आहे. किरीट सोमय्या बोलतात आणि दोन तीन दिवसांनी कारवाई होते त्यामुळे ‘ॲक्युरेट प्रेडीक्शन’ करणारे गृहस्थ म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रात आहे.
केंद्रीय यंत्रणा कोणतीही कारवाई करण्याअगोदर त्याची कल्पना किरीट सोमय्या यांना देतात आणि त्यांना कल्पना देऊनच कारवाया करतात असा आभास तयार झाला आहे. या सगळ्याचा सरकारवर परीणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकार व सरकारमधील संबंधित लोकांना बदनाम करण्यासाठी या यंत्रणा वापरल्या जात आहेत. सरकारबद्दल संशय व शंका निर्माण करण्यासाठी या यंत्रणांचा वापर होत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
Leave a Comment