सावरकरांचे नाव न दिल्याने फडणवीसांची संमेलनाला दांडी!
मुंबई, दि. ४ डिसेंबर
नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पाहुण्यांच्या मानपमानाचा रंग चढला आहे. संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही संमेलनाला जाण्यास नकार दिला आहे. जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
फडणवीस म्हणतात, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? नाशिक स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव!
या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले याचे स्वागतच आहे पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो व अ. भा. मराठी साहित्य संमेलनालासुद्धा शुभेच्छा देतो, असेही फडणवीस म्हणाले.
Leave a Comment