‘अलमट्टी’विषयी जयंत पाटील यांची येडीयुरप्पांशी चर्चा
अलमट्टीविषयी जयंत पाटील यांची येडीयुरप्पांशी चर्चा
बंगळुरू, दि. १९ जून :
यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात समन्वय साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली.
या बैठकीदरम्यान कृष्णा व भीमा नद्यासंदर्भात येणाऱ्या काळात पूराचे नियंत्रण कशापध्दतीने करता येईल आणि त्यात कोणत्या पध्दतीने दोन्ही राज्याने समन्वय ठेवायचा याची चर्चा झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. २०१९ चा पूर लक्षात घेता, गतवर्षी अचूक नियोजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले होते. यंदाही पश्चिम महाराष्ट्राला पूराचा तडाखा बसू नये यासाठी जयंत पाटील प्रयत्नशील आहेत. आजची भेटही पूर नियंत्रणाच्या नियोजनाचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्राने रिअल टाईम डाटा अक्वीझिशन सिस्टीम (जलहवामान विषयक विनाविलंब माहिती मिळविण्याबाबतची यंत्रणा) बसवली आहे मात्र कर्नाटक सरकारने ही यंत्रणा अजून बसवलेली नाही. कर्नाटकात ही यंत्रणा तयार झाली तर एकत्रित अलमट्टीची डायनॅमिकली लेवल कंट्रोल करणं शक्य होईल आणि एकंदर येणारा अलमट्टी धरणातील येवा आणि पुढे जाणारा येवा व महाराष्ट्रात पडणारा पाऊस या सगळ्यावर डायनॅमिकली आपण जर कंट्रोल ठेवला तर कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती लेवल ठेवायची खास करुन अलमट्टीची याच्यावर चांगलं नियंत्रण ठेवता येईल अशीही चर्चा झाल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
आजची बैठक दोन्ही राज्यात समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
