अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी BMC ने काय तयारी केली ?

0
20201122_192930

अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी BMC ने काय तयारी केली ?

मुंबई, दिनांक ७ जून :
मुंबई सह कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला असताना या संकटाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने काय तयारी केली आहे. याची माहिती आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

चहल म्हणाले की, यावर्षी पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आले असून याद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी ज्युनिअर इंजिनिअर स्पॉटवर राहून पाणी निचऱ्याचे काम करतील असेही ते म्हणाले. हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केल्याचे ते म्हणाले. त्यांनी पालिका क्षेत्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनला निधी देऊन स्कॉड तयार केल्याची माहिती दिली. हे स्कॉड त्या वॉर्डमध्ये झाडे पडल्यास,हायटाईडमुळे अडचणी निर्माण झाल्यास त्याच्या निवारणाचे काम करतील, झाडं पडल्यास ते तत्काळ तिथून हटवून रस्ते वाहतूकीसाठी मोकळे राहतील याची काळजी घेण्यात आल्याचे सांगतांना त्यांनी प्रत्येक वार्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या असून गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरीत केले जाईल असे सांगितले. एनजीओच्या मदतीने स्थलांतरीत लोकांच्या जेवणाची व्यवस्था केल्याची माहिती ही त्यांनी दिली.

राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. लसीचे साठे ज्या शीतगृहात आहेत तिथे पॉवर बॅकअप दिल्याचेही ते म्हणाले.  मुंबई महानगर पालिका रुग्णालये, शासकीय रुग्णालये,  क्षेत्रातील कोविड सेंटर्सवर तसेच खासगी  रुग्णालयांकडे ऑक्सीजनचा साठा पुरेसा असल्याबाबत, पॉवर बॅकअपच्या सुविधांकडे लक्ष देण्यास कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यांनी  जनरेटर्सची उपलब्धता, अतिरिक्त लागणारे जनरेटर्स, डिझेलचा साठा याची ही माहिती दिली.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की , मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात पाणी साचणाऱ्या स्थळांचा शोध घ्यावा, पंपींग स्टेशन्स आणि झडपा यांची व्यवस्थित पाहणी करावी, ही यंत्रणा व्यवस्थित सुरु आहे याची काळजी घ्यावी. हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी, यातील अडथळे दूर करावेत, लो लाईन एरियात विशेष काळजी घ्यावी, गरज पडल्यास या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात, धोकादायक इमारतींमधील नागरिकांना धोक्याची कल्पना देऊन संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरीत होण्यास सांगावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *