तोक्ते चक्रीवादळाच्या सूचनांकडे ONGC ने दुर्लक्ष का केले?
तोक्ते चक्रीवादळाच्या सूचनांकडे ONGC ने दुर्लक्ष का केले?
निरपराध कामगारांचे जीव धोक्यात घालणार्यांवर कडक कारवाई करा.
मुंबई दि. १९ मे :
तोक्ते चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार प्रहार करणार हे संबधित यंत्रणेने सांगितलेले असतानाही
ONGC ने सर्व सूचनांकडे का दुर्लक्ष केले? सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही? पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने याचे उत्तर द्यायला हवे
असा सवाल करतानाच कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
तोक्ते चक्रीवादळाबद्दल अवगत करण्यात आले होते आणि सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशाराही देण्यात आला होता. स्थानिक सरकारी एजन्सींनी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली होती आणि मच्छीमारांना समुद्रात जाऊ नका असे सांगण्यात आले होते मग ONGC ने सर्व सुचनांकडे दुर्लक्ष का केले आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही? चक्रीवादळ सुरू होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सर्व कामगारांना बार्जमधून बाहेर का काढले नाही आणि किनार्यावर आणले नाही. त्यामुळेच ६० निरपराध कामगारांचे जीव धोक्यात आले.या दुर्लक्षामुळे ६० लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि बर्याच जणांनी आपला जीव गमावला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
जे या बार्जवर प्रभारी होते त्यांनी योग्यवेळी स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला नाही अशा लोकांवर कारवाई करुन शिक्षा करण्यात यावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली आहे. या बचाव कार्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दल रेस्क्यू ऑपरेशन करून कामगारांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
