निवडणूका संपल्या की दरवाढ ठरलेलीच !
निवडणूका संपल्या की दरवाढ ठरलेलीच !
पेट्रोल-डिझेल दरवाढीवर जयंत पाटील यांनी अर्थमंत्र्यांवर साधला निशाणा.
मुंबई दि. १२ मे :
निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच ! हे काय वित्त नियोजन आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
कोरोना परिस्थितीत देशात व राज्यात वाढलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९२.०५ रुपये आणि डिझेलची किंमत ८२.६१ रुपये प्रति लीटर झाली आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल १००.७५ पैसे तसेच डिझेलही ९०. ६८ रुपये दराने विक्री केली जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर ९८.३६ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ८९.७५ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा असे मत जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे व्यक्त केले आहे.
