साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीसमोर येणे महत्वाचे.

0
IMG_20210414_215354

साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीसमोर येणे महत्वाचे.

मुंबई, दि.१४ एप्रिल:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तम कायदेपंडित होते. त्यांच्या विचाराने सर्व सामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन होण्यास मोठी मदत झाली. त्यांचे विचार समजून घेत असताना ते साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढी समोर येणे तेवढेच महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने संपादित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोअर्स मटेरियल खंड क्र. ३-१ जनता या खंडाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

या प्रकाशन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष उदय सामंत, ऊर्जा मंत्री तथा समितीचे सदस्य डॉ. नितीन राऊत, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा समितीचे उपाध्यक्ष प्राजक्त तनपुरे,आमदार लहू कानडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ.कृष्णा कांबळे,डॉ. भालचंद्र मुणगेकर आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले, हा ग्रंथ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं सोनं आहे. यामध्ये सर्व विषयांचा समावेश असून कुठलंही पान उघडले तर त्यांचे विचार यातून दिसतात. या विचाराचे प्रकाशन आज करत आहोत हे भाग्य आहे. यातूनच त्यांची विद्वत्ता दिसून येते.ती पुस्तकीय नव्हती तर अनुभवाची होती. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धाडस, शौर्य बाबासाहेबांमध्ये होते. त्यांचे विचार आपण टप्याटप्याने खंड रुपात समजून घेत आहोत परंतु अखंड डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेतलं पाहिजेत.

महाविकास आघाडी सरकार हे या विचाराचे सरकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य प्रकाशनासाठी निधीची कमतरता भासणार नाही. साहित्य प्रकाशनासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *