भगीरथ भालके पंढरपूरसाठी आधुनिक ‘भगीरथ’ ठरेल !
भगीरथ भालके पंढरपूरसाठी आधुनिक ‘भगीरथ’ ठरेल !
भरपावसात जयंत पाटलांची विरोधकांवर फटकेबाजी.
पंढरपूर दि. 12 एप्रिल :
पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे भरपावसात भिजले आणि सातारामधील शरद पवारसाहेबांच्या पावसातील त्या सभेची आठवण पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर तरळली.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनिमित्ताने भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली मात्र सभा आटोपती न घेता जयंत पाटील यांनी पावसाच्या साक्षीने भगीरथ भालके यांच्या विजयाचे सूतोवाच केले.
मंगळवेढ्याला जास्तीतजास्त पाणी मिळावे यासाठी भारत नाना भालके २००९ पासून पाठपुरावा करत होते. भाजपसरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. आपले सरकार आले त्यावेळी मला मंत्री केले नाही तरी चालेल पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या अशी भूमिका घेतली होती याची आठवण करून दिली.
योगायोगाने जलसंपदा मंत्री झाल्यावर आणि आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतले मात्र ते कधीच फिरकले नाहीत. परंतु भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागले आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भगीरथ भालके यांना विजयी करा, भारत नानांचा हा मुलगा आदरणीय पवारसाहेबांच्या आशिर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
