कांदळवनाच्या संरक्षणासाठी कठोर पाऊले उचला!
कांदळवनाच्या संरक्षणासाठी कठोर पाऊले उचला!
मुंबई, दि. 18 फेब्रुवारी :
कांदळवनाची होणारी कत्तल रोखणे तसेच कांदळवनावर डेब्रीज टाकून त्याचे नुकसान करण्याच्या प्रकाराला तत्काळ आळा घालणे आवश्यक असून यासाठी कठोर पाऊले उचलण्यात यावीत, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनांचे असलेले महत्त्व लोकांना समजून सांगण्यासाठी प्रबोधन करण्याबरोबरच कांदळवनाच्या जागी संरक्षक भिंती किंवा कुंपण बांधणे, सीसीटीव्ही लावणे आदी उपाययोजना करण्यात याव्यात. कांदळवनावर डेब्रीज टाकणारी वाहने आणि संबंधित विकासकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, पोलीस उपायुक्त चैतन्या एस. आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कांदळवनांचे जतन आणि संवर्धनासाठी मंत्री ठाकरे हे वेळोवेळी बैठका घेऊन याचा आढावा घेत आहेत. मागील आठवड्यात कांदळवनांवर डेब्रीज टाकणाऱ्या काही वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला गती देण्यात यावी, संबंधित वाहने ताब्यात घेण्यात यावीत, तसेच फक्त वाहनचालकावर कारवाई न करता डेब्रीजचा स्त्रोत शोधून संबंधित बांधकाम विकासकावरही कारवाई करण्यात यावी, अशा सूचना मंत्री ठाकरे यांनी दिल्या.
कांदळवनाचे नुकसान करणाऱ्या संबंधितांवर वन आणि पर्यावरण संवर्धनविषयक नियमांनुसार एफआयआर दाखल करण्यात यावेत. तसेच या प्रकरणांचा न्यायालयातही योग्य पाठपुरावा करण्यात यावा.
