गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवा!
गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवा !
गडचिरोली, दि. २८ जानेवारी:
हा जिल्हा कुणाचा गड नाही… या जिल्ह्यात भाजपही जिंकते… काँग्रेसही जिंकते… राष्ट्रवादीही जिंकते… कारण काम करेल त्याच्या मागे इथली जनता जाते हा ट्रेंड आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावे…लोकांचे प्रश्न समजून घ्यावे…त्या प्रश्नांची सोडवणूक करावी… नक्कीच इथे आपली ताकद वाढेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आरमोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना व्यक्त केला.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याला आज सुरुवात झाली असून पहिल्या दिवशीच्या दुसर्या टप्प्यात आरमोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत संवाद साधला.
आरमोरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची जिद्द आहे. आपण सर्वांनी जिद्दीने काम केले तर नक्कीच आपण इथल्या तळागाळातील लोकांमध्ये पोहोचू, पवारसाहेबांचे विचार इथल्या लोकांमध्ये रुजवू. जनता मागे असेल तर आपण काहीही करू शकतो, जनता मागे नसेल तर काहीच करू शकत नाही. जनतेचा पाठिंबा हवा असेल तर त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करा जर तुम्ही हे साध्य केले तर आरमोरीचे भविष्य राष्ट्रवादी काँग्रेस असेल असा आशावाद जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, आमदार धर्माराव आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
