जयंत पाटलांचा परिवार संवाद दौरा गडचिरोलीतून सुरू.

0
IMG-20210128-WA0083

जयंत पाटलांचा परिवार संवाद दौरा गडचिरोलीतून सुरू.

राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराशी हितगुज साधण्याचा प्रयत्न.

गडचिरोली, दि. २८ जानेवारी :
राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराशी हितगुज साधण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संवाद दौर्‍यात केले.

आजपासून राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा सुरू करण्यात आला असून याची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून करण्यात आली.

पवारसाहेबांवर असलेल्या निस्सीम प्रेमामुळे पहिल्याच दिवशी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. सरकार आज आपल्या विचारांचे आहे म्हणून अधिकाधिक लोकांचे प्रश्न सोडवून पक्ष अधिक बळकट कसा करता येईल त्यावर आपण लक्ष द्यायला हवे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत तळागाळातील लोकांसाठीच काम केले आहे. स्वर्गीय आर.आर.आबा ज्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळी इथल्या लोकांना जास्त वेळ देत होते. आज आबांना जाऊन अनेक वर्षे झाली मात्र आजही इथले लोक त्यांची आठवण काढतात याची आठवणही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना करून दिली.

माझी कार्यकर्त्यांना सुचना आहे की त्यांनी बुथ कमिट्या तयार कराव्यात. बुथ हीच सत्तेची गुरुकिल्ली आहे. आपल्या पक्षाच्या बुथ कमिट्या ताकदवान असेल तर आपल्याला सहज विजय मिळवता येतो. त्यामुळे आपले बुथ सक्षम करावेत. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांच्या मदतीने आपल्या गावाचा जास्तीत जास्त विकास कसा होईल याचा विचार नवनिर्वाचित सदस्यांनी करावा असे आवाहनदेखील जयंत पाटील यांनी केले.

कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा दौरा आखला असून आपल्या दौऱ्याच्या सुरुवातीसाठी विदर्भ निवडला याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार मानले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या या भागाला भेट देण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्स्फूर्त वातावरण तयार होईल अशी खात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.

गडचिरोली येथे पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत एक चांगले यश संपादित केले. पुढच्या निवडणुकांमध्येही अशाच प्रकारे यश मिळावे यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले.

शासनाने सर्वात मोठी साडे बारा हजार पोलीस भर्ती आणली आहे. त्याचप्रमाणे गडचिरोलीतही भर्ती होणार आहे. तरुणींनी – तरुणांनी यासाठी तयारीला लागावे असे आवाहन केले.

महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता राज्यात शासन शक्ती कायदा आणणार आहे. अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल अशी तरतूद या कायद्यात असेल हेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, आमदार धर्माराव आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *