अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा!
अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा!: अतुल लोंढे.
मुंबई, दि. २४ जानेवारी:
मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅटमधील अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. ५१० पानांच्या या चॅटमध्ये न्यायाधिशांना विकत घेण्याची भाषा केली आहे, हे अत्यंत गंभीर असून न्यायव्यवस्थचे स्वातंत्र्य अबाधित होते त्याला कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. न्यायाधिशांनी स्वेच्छाधिकारने याची दखल घेणे गरजेचे होते परंतु जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडू नये यासाठी चौकशी होणे गरजेचे असून त्यासाठी अर्णब गोस्वामीला लवकरात लवकर अटक करुन सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
अतुल लोंढे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, अभिनेता सुशांतसिंह राजपुतचे प्रकरण पाटण्यातून मुंबईला हलवण्याची रिया चक्रवर्तीची याचिका सुप्रीम कोर्टात होती ती मान्य करण्यात आली नाही त्यामागे अर्नब गोस्वामी होते असे या चॅटमधून दिसते. तसेच टीआरपी प्रकरणात दिग्गज वकील न्यायालयात बाजू मांडणार आहेत तुम्ही न्यायाधिशांना विकत घ्या असा सल्ला देण्यात आलेला आहे. या लोकांनी न्याय व्यवस्थेतही घुसखोरी केली असून न्यायाधीशही विकत घेतले जाऊ शकतात असा संदेश जनतेत जात आहे. यातून सरन्यायाधिश यांच्या कारकिर्दीवरही बोट ठेवल्यासारखे आहे. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य व स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की,या चॅटमध्ये हरकत घेण्यासारखे अनेक मुददे आहेत. न्यायव्यवस्थेला स्वतःच्या स्वार्थासाठी खरेदी करता येऊ शकते असे त्या चॅटमध्ये आलेले आहे ते अत्यंत गंभीर आहे. न्याय पालिकेवर लोकांचा विश्वास आहे त्यातील न्यायाधिश विकत घ्या, असा सल्ला देणे अत्यंत गंभीर असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.
