निसर्ग चक्रीवादळ बाधित मच्छीमारांना तातडीने मदत द्या !
निसर्ग चक्रीवादळामध्ये बाधित मच्छीमारांना तातडीने मदत द्या !
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश..
मुंबई, दि. 6 जानेवारी :
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामध्ये बाधित मच्छीमार बांधवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ज्याचे पंचनामे झाले आहेत. त्यांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करुन द्या, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामध्ये बाधित मच्छीमार बांधवाचे पंचनामे झाले असून त्यांना आर्थिक मदत मिळण्याबाबत बैठक विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार रमेश पाटील, मत्स्य विकास विभागाचे आयुक्त अतुल पाटणे,रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, महसूल उपायुक्त कोकण विभाग मकरंद देशमुख, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सु.ह. उमराणी यासह मच्छीमार बांधवाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पटोले म्हणाले की, चक्रीवादळामुळे रेवदंडा, हरणे बंदर, या ठिकाणी बाधित मच्छीमार बांधवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ज्याचे पंचनामे झाले आहेत. परंतू ज्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही. अशा चक्रीवादळामुळे बाधित मच्छीमार बांधवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना मदत व पुनर्वसन विभागाने तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, असे निर्देश ही पटोले यांनी दिले.
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या वाढीव नुकसानीबाबत 28 कोटीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्याने युटी लायझेशन प्रमाणपत्र तातडीने सादर करावे. शासनाने ठरवलेल्या वाढीव धोरणानुसार बाधित मच्छीमारांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करुन देण्यात यावी.
कोळी वाड्याच्या सिमांकनाचे काम तातडीने पूर्ण करा…
ज्या कोळी वाड्याच्या सिमांकनाचे काम अद्यापही झालेले नाही. त्याबाबत स्थानिक कोळी बांधवांना विश्वासात घेऊन ते काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
मुंबईतील उर्वरित 29 कोळी वाड्यांचे सिमांकनाचे काम लवकरात लवकर सुरु करा. याबाबत विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील उर्वरित 29 कोळी वाड्यांचे सिमांकनाचे कामाला चालना देण्यासाठी मा. महसूल मंत्री नगरविकास, महसूल, जिल्हाधिकारी, मत्स्य विकास विभाग यांची संयुक्तरित्या बैठक घेण्यात येईल, असेही पटोले यांनी सांगितले.
मुंबईमध्ये एकुण 41 कोळी वाडे असून मुंबई शहर मध्ये 12 मुंबई उपनगरात 29 कोळी वाडे आहेत. यापैकी काही कोळी वाड्याचे सिमांकन झालेले नाही. या कोळी वाड्याचे सिमांकन कोळी बांधवांना विश्वासात घेऊन ते काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश पटोले यांनी दिले.
सायन कोळी वाड्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. इतर कोळीवाड्याच्या सिमांकनाबाबत आम्हाला संरक्षण देण्यात यावे किंवा नवीन बांधकामसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी कोळी बांधवाच्या वतीने करण्यात आली.
