Ads

-

नववर्षाचे स्वागत करा पण जपून!

By Xtralarge News

December 28, 2020 9:04 pm

Ads

नववर्षाचे स्वागत करा पण जपून !

मुंबई, दि. २८ :
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव वर्षाचे स्वागत
करताना यंदा खबरदारी घेण्याच्या सुचना राज्य सरकारने केल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकतो.त्यामुळे नवीन वर्षाच्या आनंदावर विरजण पडू शकते.

राज्य सरकारने यासंदर्भात काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार चार पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. मास्क लावणे, यावर विशेष लक्ष असणार आहे. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी जाण्यास मुभा आहे पण गर्दी करता येणार नाही.

मदत व पुनर्वसन विभागाने २२ डिसेंबर, २०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या सूचना विचारात घेत ३१ डिसेंबर व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने ३१ डिसेंबर २०२० रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व १ जानेवारी २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. कोविड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

No comments to show.

Leave a Comment