तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?
तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?
शेतक-यांना देशद्रोही ठरवणे हे आणीबाणीपेक्षा घातक.
मुंबई, दि. 13 डिसेंबर:
महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘आपल्या अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला देशद्रोही ठरवणे, अतिरेकी ठरवणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर येणारा आपला अन्नदाता असेल तर त्याच्याशी नीट बोलण्याऐवजी त्यालाच देशद्रोही, अतिरेकी, चिनी, पाकिस्तानी म्हणायचं?
पाकिस्तानमधून कांदा आणणारे तुम्हीच, आता पाकिस्तान मधून शेतकरी पण आणायला लागलात? की आपल्याच शेतकऱ्यांना पाकिस्तानचं सर्टिफिकेट द्यायला लागलात? अशा पद्धतीचा कारभार आपला देश सहन करणार नाही. न्यायहक्कांसाठी लढायला उतरल्यानंतर त्यांना देशद्रोही ठरवणे हे आणीबाणीपेक्षा जास्त घातक आहे, असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे .
