अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल!
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आरोप पत्र दाखल!
मुंबई, दि. 6 डिसेंबर:
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग न्यायालयात १९१४ पानी आरोपपात्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात रायगड पोलिसांनी ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.
आरोपपत्र दाखल होताच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून या आरोपपत्राची दखल घेऊ नये असे निर्देश अलिबाग कोर्टाला द्यावेत अशी विनंती त्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे.
राज्य सरकारची संपूर्ण कारवाई ही कुहेतूने आणि मला लक्ष्य करण्यासाठीच आहे. म्हणूनच सत्तेचा गैरवापर करत माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करून अलिबाग कोर्टाला निर्देश द्यावेत असे गोस्वामी यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.
अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामीसह तिघांना रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. त्यानंतर गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती.सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.
