….. तर भारत जागतिक महासत्ता होईल !
….. तर भारत जागतिक महासत्ता होईल !
‘संविधानातील भारत’ साकार करुया.
मुंबई दि. 26 नोव्हेंबर:
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत, त्यांना अभिप्रेत असणारा संविधानातील भारत साकार केल्यास भारत जागतिक महासत्ता होईल असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
संविधान दिनानिमित्त रामदास आठवले यांच्या वांद्रे येथील संविधान निवासस्थानी 71 संविधान ग्रंथाचे वाटप करण्यात आले. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून ‘संविधानातील भारत’ साकार करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची पेरणी करणारा सर्वधर्मसमभावाच्या विचारांचा संस्कार घडविणारा, विविधतेने नटलेल्या भारताची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधीत राखणारे भारतीय लोकशाहीला मजबूत करणारे संविधान आहे.संविधान आपल्या देशाचा प्राण आहे, आपला श्वास आहे. संविधानाचा आम्हाला अभिमान आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान मानणारे आहेत. त्यांनी 2019 च्या निवडणुकी नंतर संसदेत त्यांची नेता म्हणून निवड झाल्यानंतर प्रथम संविधानाला अभिवादन केले होते. त्यामुळे ते संविधान बदलणार असा खोडसाळ आरोप कोणी करू नये असे आठवले म्हणाले.
