वीज कनेक्शन तोडाल तर संघर्ष मनसेशी !
वीज कनेक्शन तोडाल तर संघर्ष मनसेशी आहे..
वीजबील सवलतीवरून मनसे आक्रमक…
मुंबई, दि. 26 नोव्हेंबर:
कोरोना काळात भरमसाठ वीजबील आकारुन वीज कंपन्यांनी अक्षरशः लुट केली. या लुटीविरोधात जनतेत तीव्र संताप आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सवलत देण्याची घोषणा करून नंतर शब्द फिरवला. सरकार वीज बिल सवलत देत नाही म्हणून विरोधी पक्षही आक्रमक झाले. भाजपा नंतर आज मनसेने
ठाकरे सरकारविरूध्द मोर्चा काढला.
मुंबईत मनसेने वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सरकार जर गंभीर असेल तर दखल घेईल, जर गंभीर नसेल तर मनसेच्या भाषेत इथून पुढे सरकारला उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला. आम्ही वीजबिल भरणार नाही. कोणी वीज कापण्यासाठी आलं तर त्याच्या कानाखाली शॉक काढू, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.
मुंबईतील मोर्चात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याच्या इतर भागातही मनसेने मोर्चा काढून सरकारचा निषेध केला आणि वीजबील सवलत देण्याची मागणी केली.
