कोकणवासीयांना तात्काळ मदत करावी!: प्रकाश आंबेडकर
रायगड, दि. २४ जून २०२०
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून फळबागा, घरे तसेच शाळांना त्याचा मोठा फटका बसला आहे. शासनाने यांना मदतीचा हात पुढे केला असला तरी अजूनही मदत मिळालेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंडणगड तालुक्याला भेट दिली. सुपारी आंबा-काजू या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच हजारो घरांचे छप्पर उडून गेले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. शाळा तसेच महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागात अद्यापही वीज प्रवाह सुरळीत झालेला नाही. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावरही झाला आहे.
कोकणात गुंठा पद्धत असून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकरी आणि हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची पद्धत आहे ही पद्धत या ठिकाणी अंमलात आणू नये, गुंठा पद्धतीनेच नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ज्या घरांचे नुकसान झाले आहे ते सरसकट न देता प्रत्येक घरांचे किती नुकसान झाले आहे ते पाहून नुकसान भरपाई देण्यात यावी, जेणे करून ते त्यांच्या पायावर उभे राहतील. हे सरकार कोकणवासीयांवर उभे असून कोकणातील लोकांनी पहिल्यांदाच मदत मागितली आहे. शिवसेना त्यांना पूर्णपणे मदत करेल अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
