दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरं उघडणार!
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरं उघडणार…
मंदिर उघडणे हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा!
मुंबई, दि. 14 नोव्हेंबर:
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळांचे दरवाजे खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवार १६ नोव्हेंबर पासून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार आहेत.
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कोरोना
काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंद असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.
हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा!
मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासूररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर करोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही.
महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव-देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच’.
मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथील केले होते. मात्र, मंदिरे व धार्मिक स्थळांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. राज्यात सर्व गोष्टी सुरू होत असताना केवळ मंदिरे आणि धार्मिक स्थळेच बंद का, असा सवाल राजकीय पक्ष, काही धार्मिक संकटना करत होत्या…अखेर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिराचे दरवाजे उघडले जात आहेत.
