माफी मागणार नाही, दंडही भरणार नाही!
कुणाल कामरावर न्यायालयाचा अवमान केल्याची केस.
अर्णबच्या जामिनानंतर कुणाल कामराची कोर्टावर टीका.
नवी दिल्ली, दि. १३ नोव्हेंबर
पत्रकार अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने तातडीने जामीन मंजूर केल्यामुळे देशभरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गोस्वामींनी अर्ज दाखल करताच दुसऱ्या दिवशी त्यावर सुनावणी घेत सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. सर्वसामान्य माणसांना अनेक महिने तारखाही मिळत नसताना अर्नबना दिलेली विशेष वागणूक अनेकांना खटकली. कॉमेडियन कुणाल कामरा यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर व निकाल देणाऱ्या न्यायाधिशांवर टीका केल्यानंतर त्याच्यावर कोर्टाचा अवमान केल्याची केस चालवली जाणार आहे.
कुणाल कामरा यांनी मात्र कसलीही नमती भूमिका न घेता माझ्यावर केस चालवली तरी, मी वकील देणार नाही, दंड भरणार नाही आणि माफीही मागणार नाही, असा पवित्रा घेत माझ्यावर वेळ घालवण्यापेक्षा इतर प्रकरणावर वेळ घालवा असे ट्विट केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये कुणाल कामरा म्हणतात, सुप्रीम कोर्टाने अजून माझ्या ट्विटसंबंधी काही जाहीर केलेले नाही. पण जेव्हा कधी करतील तेव्हा ते हसतील,”
कुणाल कामरानी एका ट्विटमध्ये सुप्रीम कोर्टात, महात्मा गांधींच्या जागी हरिश साळवे यांचा फोटो तर पंडित जवाहरलाल नेहरुंच्या जागी महेश जेठमलानी यांचा फोटो लावा असेही म्हटले होते.
