मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी कोणते आश्वासन दिले ?
मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी कोणते आश्वासन दिले ?
मुंबई, दि. २२ जून २०२०
कोरोनामुळे सुमारे २५०० निवासी डॉक्टरांच्या रखडलेल्या (पदव्युत्तर डिग्री आणि डिप्लोमा) परिक्षा, परदेशांत अडकून पडलेले हजारो महाराष्ट्रीय बांधव आणि परप्रांतीय मजुरांची नोंदणी या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
“निवासी डॉक्टर एकीकडे कोरोनारुग्णांसाठी लढत असताना दुसरीकडे त्यांच्यावर परीक्षेची (१५ जुलै) टांगती तलवार आहे. या परीक्षेबाबत विद्यार्थी-डॉक्टरांनी सुचवलेल्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा”, अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली.
“परप्रांतातून जे मजूर आता पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत, त्यांची आंतरराज्यीय स्थलांतर कायद्याद्वारे नोंदणी आणि वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना राज्यात घ्यावे, आणि त्यादृष्टीने राज्य सरकारला आपण आदेश द्यावेत”, अशी मागणी मनसेचे नेते व आमदार राजू पाटील यांनी यावेळी केली.
“आखाती देश आणि किरगिजीस्तानमध्ये अडकून पडलेल्या मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत नसून राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालावे”, अशी मागणी मनसे सरचिटणीस सौ.शालिनी जितेंद्र ठाकरे यांनी केली. “इतर राज्यांना जर चार्टर विमानं मिळू शकतात, तर महाराष्ट्राला का नाही”, असा सवाल उपस्थित करत “महाराष्ट्रात येणा-या वंदे भारतच्या विमानांद्वारे महाराष्ट्रीय लोकांनाच प्राधान्याने महाराष्ट्रात परत आणायला हवं” असं मत शालिनी ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.
“आपण मांडलेले विषय महत्वाचे आहेत. मी त्यात लक्ष घालतो” अशा शब्दांत राज्यपाल कोश्यारी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. मनसेच्या शिष्टमंडळात मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, सरचिटणीस शालिनी ठाकरे, उपाध्यक्षा दीपिका पवार आणि हर्षद पाटील यांचा समावेश होता.
