नोकरभरतीची वडेट्टीवारांची मागणी योग्यच!
मराठा आणि ओबीसी समाजाच्या विषयात राज्य सरकारने मध्यम मार्ग काढावा.
मुंबई दि. ३० ऑक्टोबर:
मराठा समाजाचे आरक्षण वगळता ओबीसी समाजाच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारने मधला मार्ग काढण्याची गरज आहे, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज सांगितले.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या मागणी वर दरेकर म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने संवेदनशीलपणाने लक्ष देण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांचा प्रश्न आहे. यासोबत ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचाही प्रश्न आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर नोकरभरतीत अन्याय होता कामा नये, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
मराठा आणि ओबीसी समाजातील तरुणांना नोकऱ्यांची गरज आहे. ओबीसी समाजात देखील मोठया प्रमाणात आर्थिकरित्या कमजोर कुटुंब आहेत, त्यांच्याही नोकऱ्यांचा प्रश्न आहे. यामुळे राज्य सरकारमधील एक मंत्री जर मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा, अशी मागणी करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
ओबीसी समाजात कष्टकरी मंडळींचा समावेश आहे म्हणून वडेट्टीवारांची भावना काही चुकीची नाही. समाजा समाजामध्ये दरी निर्माण न होता सामंजस्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती त्यांनी पार पाडावी असे सांगतानाच ते म्हणाले की, आमच्या सोबत ओबीसी समाजाचेही नुकसान होता कामा नये. एक तर तेवढ्या जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवून त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने नंतर त्यांना घेतलं गेलं पाहिजे.
